Monday, June 27, 2022

पांडुरंग

🪷🌹🪷🌹🪷🌹
मी नित्याप्रमाणे पांडुरंगाचे श्रीचरण प्रक्षाळले..ते मऊसूत वस्त्राने पुसून तयावर आपलं मस्तक ठेवलं..आणि श्रीमुखाकडे पाहिलं..सगुण साकार मुर्त मजसमोर प्रकटली.तेच सावळे सुंदर रुप.मस्तकी किरीट.मोरपीस.कंठी वैजयंती,अलंकार..
सुवर्णासम पितांबर. कटीवरील उत्तरीयाची बाजू ही हाताच्या कोप-यातून खाली विसावली आहे ती हलकेच झोके घेतेय...

अन् मुखमंडलावर वर्णन करता येणार नाही असं हास्य..
नजर भृकुटीच्यामधे विसावलेली.
माझ्या मनात कुतूहल जागृत झालं.. एक प्रश्न रेंगाळू लागला...मी तेथून वळालो.मग नित्यकर्मास लागलो..ते आटोपताच.मानसभेटीत पांडुरंगाला गाठलं.तो वृक्षातळी बसलेला होता..तिथे बसून त्याचे हात घट्ट पकडून ठेवले.पळून जायचा..त्यानं मजकडे गोड स्मित करुन पाहिलं.नजरेनंच सांगितलं जणू मी काही पळून जात नाही..
 मी त्याला म्हणालो,"
संतांनी तुझी ओळख करुन दिली.तुझी  बाळलीला वर्णन केली..नाथ म्हणालेत तू गोकुळात चोरी केलीस त्यामुळे पंढरपुरला पळून आलास..! मला एक प्रश्न पडलाय त्याचं उत्तर दे..!"
त्यानं मान हलवून अनुमोदन दिलं..
" तुझ्या गोकुळाच्या वर्णनात एवढा शांत कधी उभा राहिलास का रे कधी ?तू खट्याळ,उपद्व्यापी..तू युगे अठ्ठावीस वर्ष शांतपणे उभा ? तुझे हे डोळे मिटण्याचं नाटक तर नव्हे ? पण  किती वर्ष चाललं.? शंकराचार्य म्हणतात हे योगपिठ आहे.तू कोणत्या योग साधनेत मग्न आहेस ? आणि महत्वाचं की तू जर आत्ममग्न असशील तर दर्शनाला येणाऱ्या भक्तांचं भान तुला असेलच कसं ? बरं त्यांची भक्ती आत्मनिवेदन तुझ्याप्रत पोहोचल कसं ? कारण तू ब्रह्मरस्वरुपी निमग्न..?"

यावर तो हसला.त्याच्या गुलाबी ओठांमागील शुभ्रदंतपंक्ती झळाळून गेल्या..
" हा तुझा एक प्रश्न आहे ?" त्यानं विचारलं..व पुन्हा खळखळून मान वर करुन हसला..मी त्याला हलवलं...
"हो..एका प्रश्नात पण तू सामावत नाहीस त्याला मी तरी काय करु ? "
मग त्यानं हसू आवरलं.माझे हात हातात घेत त्यांवर हलकेच थोपटत,सरीता जलाकडे पहात म्हणाला.," ते माझं रुप वेगळं आहे..जो रुप पाहतो त्याला कटीवर हात ठेऊन समचरणी मी उभा आहे हेच दिसेल.ते माझे सगुण रुप..पण जो स्वत:ला विसरेल त्याच्या अंतर्दृष्टीला ते " स्वरुप" आहे..!
तू म्हणलास ध्यान कोणाचे ? तर मला ध्यानाची आवश्यकताच नाही..अर्जुनाने मला युद्धिष्ठिराच्या राज्याभिषेकानंतर गीता सांगायचा आग्रह केला.तेव्हा मी स्पष्टपणें सांगितलं , मी तुला गीता पुन्हा सांगू शकत नाही, कारण मी रणांगणावर योगयुक्त अवस्थेत असतांना सांगितली होती..! त्याचंच स्वरुप पांडुरंग आहे.
आणि माझी नजर भृकुटीच्यामधे मधे असली तरीही जो भक्त अनन्यभावाने मला शरण येतो त्याच्याशी ती तादात्म होते..आणि मी विश्वाकार असल्याने तो ही विश्वाकार होऊन जातो. शरणागती हे करते..माझा प्रत्येक अनन्य भक्त पांडुरंगच होऊन जातो..!"
तो स्मित करत म्हणाला.मी भाराऊन गेलो..जे ज्ञान त्याने मला प्रदान केले.ते अद्भुत होते..मी तिथेच खाली जमिनीवर बसलो आणि त्याचे श्रीचरण माझ्या मस्तकी घेतले.....!
🪷🪷🪷🪷

- पराग

Saturday, November 6, 2021

सगुण निर्गुण

🍁🍁🍁🍁🍁
ऋषिकेशच्या पावनभूमीत मंद कलरव करत वहात असलेली गंगा..दूरच्या एका पाषाणावर बसलेली प्रसन्न वदन असलेल्या तरुणाची मुर्ती.डोळे मिटून बसलेली..
कुरळे केस पाठीवर रुळलेले.अंगावर शुभ्र वसने...
ते रुप पाहून आप्पाजी धांवतच त्याच्या दिशेनं गेले.माहित नाही पण अंतरीक ओढच एवढी वाटली की राहवलं नाही..
 आप्पाजींनी पुढे होत नमस्कार केला व आपला परिचय दिला.तरुणाचं ते सुंदर तेजस्वी रुप मोहून गेले..अन् नकळत आप्पाजींच्या डोळ्यांत पाणी आलं.त्या अनामिक तरुणाबाबत प्रेमभाव दाटून आला..त्यांना वाटून गेलं इथंच प्रश्नांची उत्तरं मिळतील..तरुणाने मी कोणी नाही,मी पर्यटक आहे,मी ईश्वराचा अज्ञ बालक असं म्हणत बोलणं टाळलं.
बराचवेळ तो तरुण मौन राहिला.मग त्यानं चालावयास प्रारंभ केला.आप्पाजीही चालत राहिले..आप्पाजी एवढंच म्हणाले ," आज माझं वय सत्तरीच्या पुढे आहे.खूप साधक भेटलेत.अभ्यास साधना केलीय काहीतरी मला मिळालंय म्हणून तुम्हाला ओळखू शकलो.तुम्हाला आता लपवता येणार नाही..माझी तळमळ खूपच वाढत चाललीय.ईश्वर साकार की निराकार ? साकार असेल तर मग तो भेटत का नाही.निराकार असेल तरीही तो भेटायचा कसा ? "
 एका पाषाणखंडावर विसावत तो तरुण म्हणाला,
 " ईश्वरेच्छा प्रमाणम् ..!"
आप्पाजी तिथं खाली बसले पण त्यानं त्यांना जवळ बसवलं..
" माझे सद्गुरु रामकृष्ण परमहंस म्हणत तो साकार ही,निराकारही त्या पलिकडीलही...त्याच्या रुपाची इति व्हायची नाही.माणसाची काय बिशाद त्याला जाणू शकेल..! पण भक्तांसाठीच तो साकार होतो..,
तो तरुण आप्पाजींकडे पहात स्मित करत म्हणाला.," कळलं ?"
" पण कसा साकार होतो ? अनुभव तर येत नाही.."आप्पाजींनी विचारलं.
" भक्तीपूर्ण अंत:करणाने व्याकूळ होऊन आळवा पाहू..त्याचं नाम घ्या.त्याचं कीर्तन करा..प्रेमानं..मग तेव्हा तो कान धारण करतो..सुगंधित पुष्प,केशर कस्तुरी,नैवेद्यासाठी तो नासिका धारण करतो,अन् तुमचं अंत:करण त्याला व्यापून उरतांच तुमचं रुप पाहण्यासाठी तो डोळे धारण करतो.ज्ञानराज माऊली हेच म्हणते तद्वत मी अचक्षूस डोळे..तुमच्या भक्ती,प्रेमानं आर्ततेनं तो हृदय धारण करतो...ते स्पंदनमय होऊ लागते.तुमचे अश्रू पाहून तो अलिंगन देऊ इच्छितो त्यासाठी त्यांस बाहू लागतात..
असा निराकार ईश्वर जो त्याला भक्तच साकार करतो.त्यानं भक्ति-प्रेमाचेच कान धारण केलेत व लोकं त्याला लौकिक गा-हाणी ऐकवतात..त्याचे कान लौकिक नाहीतच..मग म्हणतात विश्वास नाही..भक्तीच्या हांकेलाच सगुणाची साद आहे."
आप्पाजींचे डोळे भरुन आले.हात जोडून ते म्हणाले, "मग मी काय करु ?"
त्यांच्या खांद्यावर हांत ठेवत तो म्हणाला, " तुमची भक्ती पक्वं होत आलीय पण व्याकूळता हवीय..तोच हवा हाच भाव हवा..बाहेरील जगाच्या कोलाहलाच्या हांकेला आपल्या इंद्रियांची " ओ " देणं बंद झालं की वृत्ती आंतच रहाते.मनानंही ओ देऊ नये..तेव्हाच तो जाणवतो..नव्हे तोच आहे जाणवतो..मी तर नाहीच असं जाणवतं.मग साकार निराकारात लय पावतं..मग जे काही असतं ते या मुखानं सांगता येत नाही..!" 
असं म्हणत तो तरुण उठला व गतीने दिसेनासा झाला.जणू अदृश्य झाला..
आप्पाजींनी त्या पाषाणावर आपलं मस्तक ठेवलं.आपल्या आसवांनी त्याला अभिषेकात नाहू घातलं...!!

- पराग 
🌹😇❤️

Friday, November 5, 2021

संगीत

🍁🪔🍁
त्या सुंदर नयनरम्य परिसरातून ऋतूपर्णचे गुरु अंगावर शाल लपेटून चालले होते.सायंकाळचा समय.सूर्य अस्तास जातांना डोंगर शिखरावर केशरी सडा शिंपून गेलेला.. 
गुरुजी आध्यात्मिक अनुभवानेही संपन्न अन् संगीतानेही.
"गुरुजी,सप्तसुरांचा नेहमीच्या जीवनाशी संबंध आहे का ?"
" आहे,निश्चितच..,गुरुजी दीर्घ श्वास घेत म्हणाले," असं पहा..सगळ्यांच लोकांच्या मुखातून सूर निघतात पण गाणं नाही.गाणं शिकावं लागतं त्यासाठी नेमका सूर लावावा लागतो..आता सां...सां नेमका अशाच पद्धतीने लावायचा असं सांगितले जाते.जास्त वर नाही जास्त खाली नाही.तसेतच इतर स्वरही.नेमके त्याच जागी.त्यातही तीव्र,मध्यम,कोमल पद्धतीने लावले जातात..मग एकदा हे सूर पक्के झाले की मग राग विस्ताराचा कसाही आनंद घ्या.विरहण करा..!"
" पण जीवन,अध्यात्म व संगीत याची सांगड कशी ?"
" सांगतो,संत,सत्पुरुष हे नेमके जीवनाचे सूर शिकवतांत..तो पाया पक्का करुन तुम्ही जीवनाची मैफिल उभी करा असं सांगतात.सम बांधून देतात..मात्र सामान्य आसक्त भोगी माणसाला ही बंधनं वाटतात.तो म्हणतो सातच सूर काय ? आम्हाला अजून सूर हवेत.मग क,ट,त,च का नाहीत..? का तालातच रहायचं ? समेवरच का यायचं ? आम्हाला मुक्त जीवन हवंय..म्हणत ते जीवन-मैफिलीची सुरुवात जोराने तर करतात.नंतर सूर बेसूर होतो.लय बिघडते.ताल चुकतो तोल जातो..आणि तेव्हा सत्पुरुषांनी दाखवलेल्या मार्गावर चालणा-याची मैफिल जगात दाद घेत फिरत असते बेटा..!! आणि तो मृत्युशय्येवर जाईपर्यंत आनंदात नाहतो.."
" वा गुरुजी..अध्यात्मही जोडलेलं आहे याला.!"
गुरुजींनी स्मित केलं व पुढं म्हणाले, " ऋतू बेटा इतकच नाही ईश्वरच मग त्याच्या मैफिलीचा श्रोता,भोक्ता होऊन जातो..सप्तचक्रांतून कुंडलिनीची शक्ति वरपर्यंत खेळत जाते आणि तेव्हाच जीवन - संगीत मैफिलीची सांगता होते.. मी पणाचा अनंतात विलय होण्यापूर्वीचा , मौनात जाण्यापूर्वीचा श्वासांचा स्वर म्हणजे भैरवी..!! "
हे ऐकून ऋतूच्या अंगावर रोमांच उभे राहिले.त्यानं गुरुजींच्या पायावर मस्तक ठेवलं..सायंपटावरील त्या दोन आकृत्या लांबून पाहणा-याला भारत वर्षाचं प्रतिबिंबच वाटलं असतं....!!
❤️

- पराग

Sunday, September 19, 2021

बिल्वपत्रं...!!🍁 बिल्वपत्रं...!!🍁त्या शांत अशा शिवालयातील गाभा-यात अभिषेकाचे मंत्र निनादत होते.यजमान दांपत्य अभिषेकासाठी बसलेलं..पलिकडे वयोवृद्ध पुजारी..चिदंबर.!शिवलिंग शुभ्रफुलांनी व बिल्वपत्रांनी सुभोभित होतं.चिदंबरांच्या मुखातून येणा-या धिरगंभिर मंत्राने वातावरणानंही लय बांधली होती.त्यांनी दांपत्यास डोळे मिटायला सांगितले..मग पुन्हा मंत्राचा स्वर चढा लावला..क्षणभराने चिदंबरांनी डोळे उघडले तेव्हा पाहिलं..दांपत्याचं जे रांगतं मूल होतं ते शिवपिंडीजवळ जाऊन बसलेलं.अगदी जवळ.त्यानं पिंडीवरील फुलं,बिल्वपत्रं हातांत घेतली होती.साळुंकेला घट्ट पकडून ते उभं राहू इच्छित होतं..ते पाहून चिदंबरांना क्रोध अनावर झाला.त्यांनी मूल पकटन बाजूला घेत दांपत्याना देत म्हणलं ," काय हे.मुलाला धरुन बसता येत नाही..सगळी पूजा बिघडवून टाकली यानं.काही शास्त्र असतं. सोवळं असतं..!!''दांपत्यानं कंपित होत शिवशंकराची क्षमा मागितली,चिदंबरांनाही नमस्कार केला..त्या स्त्रीचा कंठ दाटून आला." क्षमा करा गुरुजी.डोळे मिटल्यावर हा कसा तिकडे गेला कळलं नाही.."तिच्या पतीनं विचारलं " आता काय करावं लागेल ?" चिदंबर म्हणाले..," पुन्हा प्रथम पासून उपचार आले..तत्पुर्वी शिवलिंगास मला जातीने स्नान घालावे लागेल "असं म्हणत ते रागाच्या अविर्भावातच उठले.पाट उचलून दूर ठेवला. दांपत्यही उठलं.दोघांच्या डोळ्यात आसवं दाटली.घडलेल्या प्रकाराने मूल भांबावून रडत होतं..अन् कुणाच्याही नकळत एक १२,१४ वर्षाच्या बालकानं गाभा-यात प्रवेश करत जवळ येत त्या मुलाला आपल्या कडेवर घेतलं..तेजस्वी चेहरा.डोक्यावर शेंडी.कपाळावर त्रीपुंड..अंगात उपरणं..शुभ्र वस्त्रं.धोतर..दांपत्य स्तिमीत झालं.त्यांना कळेनाच मुलाला परत घ्यावं की त्या मनोहर अनुपम सौंदर्य लाभलेल्या बालकाकडेच राहू द्यावं..मुलानं बालकाकडं पाहिलं.त्याचं रडणं आपोआपच थांबलं.चेह-यावर जणू ओळखीचं हसू रेंगाळूं लागलं..मग त्या बालकानं मुलाला घट्ट जवळ घेत त्याच्या मस्तकावर अवघ्राण करीत ते दांपत्याकडं दिलं..व तो नम्रपणे नमस्कार करत चिदंबरांना म्हणाला," आजपर्यंतची आपली अखंडित सेवा त्याच्यापाशी पोहोचलीय..पण आता या उपचारापलिकडे जायला हवं नं..आपण विद्वान आहात.म्हणूनच नम्रपणे हे निवेदन आहे"चिदंबरांनी थोडसं रागावूनच विचारलं ," कोण आहेस तू ? तू एक अज्ञ बालक..तुला हे बोलायचा अधिकार दिला कुणी ? या आधी तुला इथं पाहिलं नाही..मधे लुडबूड करु नकोस.आम्हाला पुन्हा अभिषेक करायचा आहे..तुझ्याशी बोलायला मला वेळ नाही.''असं म्हणत ते पूजा साहित्य आवरुन ठेवू लागले.तो बालक स्मित करत म्हणाला ," अभिषेक संपन्न झालाय..अशी पूजा कधीच झाली नाही..अद्भुत पूजा."यांवर चिदंबरांनी शास्त्र सांगितलं.निरनिराळे दाखले दिले.नंतर पुटपुटत म्हणाले मी हे तुला का सांगत बसलोय..?यांवर त्या बालकानं ऋचा,मंत्र,श्लोक,स्तोत्रं स्पष्ट वाणीने उच्चारण करुन त्यांतील गर्भितार्थ स्पष्ट केला..त्याचा तो धिरगंभिर पण मधुर स्वर..तो मतितार्थ.,ते अद्भुत ज्ञान आजपर्यंत कधी ऐकलं नाही असं.हे ऐकून चिदंबर मौन झाले.दांपत्याला हे काय नेमकं घडतंय कळत नव्हतं..मग प्रेमानं जवळ येत चिदंबरांना तो बालक म्हणाला,"पूजोपचार,मंत्र यांची आवश्यकता आहेच.पण मतितार्थ समजून न घेता केवळ मुखोद्गत मंत्र म्हणून तो त्याच्याप्रत पोहोचत नाही असं नाही.. पण कालांतरानं पुढं जायला हवं नं..!! शिव हा ज्ञानाचं,त्यागाचं प्रतिक.जीवाने आपला अहं त्यागला नाही तर शिवस्वरुपी तो अवस्थित कसा होणार..?"असं म्हणत त्यानं ते मूल पुन्हा कडेवर घेतलं व म्हणाला " या बालकासमान अंत:करण व्हायला हवं..पहा इतकी वर्ष तुम्ही उपासना करुन क्रोध जिंकू शकला नाही..शिवाय शिवापेक्षा कर्मांनाच देवत्व दिलंत..म्हणूनच बालक व्हा चिदंबर..आपल्याच अवगुणांच्या बाबतच्या पश्चातापाने अंत:करणावर होणारा अभिषेकच खरा...पहा हे मूलसत्व,रज,तम या गुणांना हे बांधील नाही.म्हणून तीन पानं असलेलं त्रीगुणांचं प्रतिक बिल्वपत्रं शिवपिंडीवर वाहतांत.जीवानं गुणरहित होत स्वत:ला अर्पण करणं हेच खरं बिल्वपत्रं..मग शिवप्राप्ती सहज ठरलेली.जीव मुळातच शिव आहे..पण या गुणांनीच विभक्त होत ३ दिशांना बिल्वंपानांप्रमाणे विभागला जातो...हे बालक त्याच्या इच्छेनं साळुंकेपाशी गेलं..हेच ते बिल्वपत्रं..पूजा संपन्न झाली..!!"असं म्हणत त्यानं मूल दांपत्याच्या हाती दिलं.अन् तो गतीनं गाभा-या बाहेर पडला..चिदंबरांचं भान परत आलं..ते ही गतीनं त्याच्यामागं गेले..पण त्यांच्या डोळ्यादेखत त्या बालकाची मूर्त अदृष्य झाली..अन् वृद्ध चिदंबर हात जोडत जमिनीवर अक्षरश: कोसळले..." माझा शिव..माझा भोलेनाथ.. मला भेटून गेला..मी त्याला ओळखू शकलो नाही..!"चिदंबरांच्या आसवांनी जणू त्या बालकाच्या पाऊलखुणांना अभिषेक केला....!!!🍁 संतशरण पराग

Sunday, January 17, 2021

प्रेम...

🌹 *प्रेम* ...
ती थोडी दु:खी होती..उदास होती..
इतकं चांगलं वागूनही पदरात उपेक्षा पडली होती...प्रेमाच्या पदरीं हे का ?..
तिनं ठरवलं आज आपल्या प्रिय दैवतासमोर ठाण मांडायचं.त्यानंच उत्तर दिलं पाहिजे.दुस-या आत्ताच्या भौतिक युगातील कुणाच्याही उत्तरानं समाधान व्हायचं नाही..
घरात कुणीही नव्हतं..तेव्हा तिनं सुंदर पूजा केली.चित्त प्रसन्न करणारी उदबत्ती लावली..अन् मानसपूजेत श्री कृष्णास आवाहन केलं...
समोर कालिंदीचा तट उजळून गेला..अन् कृष्णाची सगुण मुर्ती प्रकटली..
तिनं त्याच्या चरणी मस्तक ठेवत आत्मनिवेदन केलं.त्याची पावलं आसवांनी भिजून गेली.त्या प्राणसख्यानं स्मित केलं.तिच्या मस्तकावर स्पर्श केला अन् म्हणाला , " तुला याची उत्तरं मीरा देईल.भक्तीमति मीरा..! " तो अंतर्धान पावला..तिनं मीरेला आर्त साद घातली.अन् वीणेचा मधुर झंकार प्रकटला..कालिंदीच्या जलासमिप मीरा भजनानंदी लीन होती..हिनं धांवत जाऊन तिच्या चरणाला मिठी मारली..
मीरेनं उठवून तिला जवळ घेतलं..डोळ्यातील अश्रू पुसले..न सांगताच तिचे प्रश्न कळले.हिला आश्चर्य वाटलं..एका कदंबवृक्षातळी दोघी स्थानापन्न झाल्या...
दीर्घ श्वास घेऊन मीरेनं उत्तर दिलं..
" प्रेमाला अवयव नाही.. तरीही ते बांधतं.आश्चर्य आहे नं ? खरं प्रेम बांधत नाही.ते सगळ्यांना मुक्त करतं,मुक्त ठेवतं..प्रेम म्हणजे मुक्ती..मग दु:ख का ?
वेदना का ? आपल्या प्रिय माणसाच्या उपेक्षेची वेदना खोलवर का जावी ?...
प्रेमाच्या गर्भी दुःख नाही.प्रेमाच्या गर्भी प्रेमच नांदतं..मग जगात मात्र तसं दिसत नाही.कारण अपेक्षांचं अपत्य दुःख आहे..मी प्रेम केलं,प्रेमानं केलं त्या बदल्यांत मला काही नको पण निदान प्रेम मिळावं...ही अपेक्षा.काही नको म्हणतांना आपण प्रेमाची अपेक्षा करतो..आणि ज्या प्रेमाच्या राज्यात गणितांच्या कोष्टकांचा प्रांत नाही तो मांडतो..प्रेमाचा गणिताचा संबंध नाही.कारण इथं समिकरणं नाहीत.साम्यकरण आहे..गणितात गृहित धरावं लागतं काही..गृहित धरणं हेच नात्यांतील बंधन आहे.अपेक्षा हे बंधनही आहे अन् शापही..मी प्रेम करतो ही भाषाही अयोग्य..प्रेम येतं हा स्वभाव आहे..ह्याची जाणिवही नसणं ही ऊच्च अवस्था आहे...
तो.. 
प्रेम बाँधता नहीं ,प्रेमीको मुक्त रखता है..प्रेमी स्वयंही उस प्रेममें खुदको बाँधने चला आता है ! मेरे गिरीधर गोपालको मैने नहीं बाँधा...उन्होंने खुदको बाँधा..इसिलिए वो सगुण रुपमें विद्यमान है ...!!" 

हे ऐकून हिच्या डोळ्यांत आसवांचा डोह भरुन आला..त्यानं भक्तीमति मीरेच्या पावलांवर अभिषेक केला...
🌹🌹🌹🌹

         -  पराग